बुधवार, ८ जानेवारी, २०२५

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत एकदम मस्त जगायचं असेल तर भटकंतीचा छंद जीवाला लावून घ्यायलाच हवा. त्याचाच पुढचा भाग म्हणजे झटपट बॅग भरून एका तासात वगैरे वाट्टेल त्या ठिकाणी जाण्यासाठी इंस्टंट रेडी होता यायला हवं. आता ही दोन्ही तत्व पुरेपूर अंगी बाणवून घेतल्यामुळेच की काय पण परवा अचानक ठरलेला वासोटा ट्रेक सुखरूप संपूर्ण करू शकले, त्याचाच हा वृत्तांत!

मुंबईत राहणाऱ्या माझ्या मामे भावंडांचा ट्रेकला जायचा प्लॅन रातोरात ठरत होता. माझे दाजू दोनच आठवड्यांपूर्वी वासोट्याला जाऊन आले होते. त्यामुळे वाटाड्या हाताशी आहे म्हणताच फार पुढचा मागचा विचार न करता सगळ्या गँगने उड्या मारत प्लॅन पक्का ठरवला. वीस सीटर प्रायव्हेट टेम्पो ट्रॅव्हलर बस ठरवली गेली. व्हिडिओ कॉल, व्हॉट्स अप ग्रुप्स सगळं जोरदार जमून आलं. काय काळजी घ्यावी कुणी किती खाऊ आणावा, राहायचं कुठल्या हॉटेलात हे सगळं परस्पर ठरलं. दाजू ऍडमिन झाले, मोहनदादा खजिनदार झाला आणि पटापट गुगल पे भरून पैसे जमा झाले. मुंबईतून रात्री अकरा वाजता कामोठ्याहून बस निघणार आणि पुण्यामार्गे  पहाटे चार पर्यंत साताऱ्याला कासगावापर्यंत जाऊन पोहोचणार हेही ठरलं. मध्येच माझ्या बहिणीला सुचलं की गाडी पुण्याहून जातेय तर प्राजूला नेऊयात का सोबत? वीस माणसांच्या गाडीत पंधराच लोक जमलेत; तर चला अजून एक सीट होईल ऍडजस्ट म्हणत माझ्यापर्यंत प्रोपोजल येऊन पोहोचलं. अक्षरशः तासाभरात बॅग भरून मी झोपी गेले. कारण गाडी मध्यरात्री पुण्याला पोहोचून मला पुढे घेऊन जाणार होती.

वासोट्याविषयी त्यापूर्वी मी फार काही ऐकलं नव्हतं. माझे दाजू जाऊन आले होते आणि अतिशय उत्साहात त्यांनी मला सांगितलं होतं की, असं वाटतंच नाही की आपण इंडियात आहोत एवढा वेगळाच शांत सुंदर आणि निसर्गसंपन्न परिसर आहे तो. अर्थातच भारत वेगळा, इंडिया वेगळा. मी होकार देऊन बॅग भरून झोपी गेले. उद्याचा ट्रेक नेमक्या केवढ्या दुर्गम भागात असेल याची मला अजिबात रेंज नव्हती. जाग आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. बारा ते चार अशी जेमतेम चार तासाची झोप झाली होती. इतरांची तर तेवढीही झाली नव्हती कारण निघतानाच गाडीत बिघाड झाल्याने दुसरी गाडी बदलून घ्यावी लागली होती. पुण्याहून पहाटे साडे तीन तासात आम्ही सातारामार्गे कास पठारावर पोहोचलो.

फुलांच्या बहराचा हंगाम नसल्याने नुसतीच पिवळी कुसं अंगावर लपेटून कास पठार डोलत होतं. त्या पिवळ्या सोन्याला झिलई देणारं उगवतीचं धम्म बिंब खरोखरीच फोटोजेनिक भासत होतं. बसने जसजशी दरीत उतरणारी वळणं घेतली तसतशी उसळणाऱ्या प्रसन्न वाऱ्यावर सजलेली हिरवी रानं खुणावू लागली. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला सातारा आम्हाला त्याच्या राखीव जावळीच्या खोऱ्यात वेलकम करत होता.

जावळीचं खोरं! बरोबर……! शिवरायांच्या इतिहासात ज्याचा उल्लेख आढळतो ते हेच जावळीच्या लढाईतलं खोरं. वासोट्याच्या इतिहासाविषयी मी फार काही नव्याने लिहिण्यापेक्षा विकी कोट्स देऊ इच्छिते –

              वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाले असावे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईतसुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही.

अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा --

श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;

तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा.

 

…. तर अशा या वासोट्याच्या ट्रेकविषयी पुढे सांगते. कास व्हिलेज रिसॉर्ट या साध्या परंतु स्वच्छ अशा हॉटेलात आमची मुक्कामाची व्यवस्था झाली होती. अर्थातच ऍडमिन दाजू, त्यामुळे नियोजन परफेक्ट होतं. नाश्ता गरम पाणी, जेवण आधी सांगून ठेवलं असल्याने वेळेत ट्रेकला निघणं शक्य झालं. खरंतर वासोटा चढायचा तर तांबडं फुटल्या फुटल्या सकाळच्या प्रसन्न ताज्या हवेतच चढायला सुरुवात करायला हवी. आम्हाला मात्र बसच्या बिघाडाने तीन तास उशीर झाला होता. आता प्रचंड ऊन लागणार वगैरे कल्पनेत आम्ही सन स्क्रीन चोपडून निघालो हे वेगळं सांगायला नकोच. मात्र कल्पनेहून सत्य अधिक सुंदर असतं याचा प्रत्यय पुढे लगेच आला.

कोयनेच्या बॅकवॉटरवर बांधलेल्या अथांग शिवसागर तलावाच्या काठावर बोट लागली होती. आमच्या हॉटेलवाल्या दादांनीच आमच्यासाठी बोटीचं बुकिंग करून ठेवलं होतं. जंगलात प्रवेश करण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. हे काम हॉटेलच्या ओळखीनेच शक्य झालं असावं. पाठीवर चविष्ट भाजीपोळी बांधून द्यायचं पुण्यदेखील त्यांनी साधलं होतं. अन्यथा दुर्गम चढाईने तरी नाहीतर भुकेने तरी जीव व्याकूळ झाला असता. खरंतर वासोट्याआधी बोललं पाहिजे ते त्याच्या पायथ्याशी अस्ताव्यस्त पसरलेल्या अथांग शिवसागर डॅमविषयी.

दुथडी भरून वाहणाऱ्या कोयनेच्या प्रवाहाला आडवून जावळीच्या घनगर्द जंगलात वासोट्याभोवती जो अविश्वसनीय निळ्या पाण्याचा ऐसपैस सागरवजा जलाशय निर्माण झाला आहे त्याला असं शब्दात बांधणं केवळ अशक्य. शिवरायांच्या दूरदृष्टीचा नुसता अंदाज घ्यायचा असेल तरी वासोटा उदाहरणादाखल लक्षात घ्यायला हरकत नाही. वासोटा हा महाराजांचा लाडका किल्ला नव्हताच मुळी. जावळीचं प्रचंड दुर्गम खोरं जिंकून घेतल्यानंतरदेखील महाराजांना वासोटा लगेच आपल्या ताब्यात घ्यावासा वाटला नव्हता. त्याचं कारण म्हणजे त्याची दुर्गमता. वासोट्याचा दैनंदिन बैठकीसाठी किंवा दारुगोळा साठवणुकीसाठी एवढंच काय तर टेहळणीसाठीदेखील उपयोग करून घेणं राजांना सोयीचं वाटत नव्हतं. योग्य वस्तू अथवा व्यक्तीचा योग्य वेळीच योग्य ठिकाणी वापर करवून घेता येणं हे तर शिवरायांच्या मुत्सुद्दी कारभाराचं वैशिष्टय होतं. वासोटा त्यांनी हेरून तर ठेवला होता परंतु ताब्यात घेण्यास महाराज दिरंगाई करत होते ते त्याचमुळे. ताब्यात घेतला तर त्याचा योग्य वापर तर व्हायला हवा ना. वासोटा महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला तो दिनांक ६ जून १६६० रोजी. महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला ताब्यात घेतल्याची नोंद आहे. शत्रूला चोहीकडून वेढून कैदेत ठेवायचं असेल तर दुर्गतम रत्न वासोटा हाती असलाच पाहिजे ही तेव्हा त्यांना सुचलेली कल्पना. वासोट्याला पोहोचायचं तर आधी कोयनेच्या प्रचंड जलप्रवाहातून जावळीच्या खोऱ्यात उतरावं लागतं. जावळीच्या जंगलात आजदेखील भर दुपारी वाघाची डरकाळी ऐकू येते, अस्वलाची चोहीकडे पावलं दिसतात तर शिवकालात कशी असेल परिस्थिती याची कल्पना येऊच शकते.

लाटांवर विहरणाऱ्या स्वछ निळ्या पाण्यातून मोटर बोटीने वासोट्याकडे जायला लागतो तो तब्ब्ल एक तास. बामणोलीच्या काठावरून बोट घेतली तर पंधरा सोळा माणसं सहज मावतील अशी मध्यम आकाराची बोट चक्क एक तासभर धावते तेव्हा कुठे ती जावळीच्या जंगलात वासोट्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचते. वारा कापत जाणारी शांत निळ्या पाण्यावरची एकुटवाणी होडी चहूबाजूंनी घनगर्द झाडीने नटलेल्या वनगर्द डोंगराईचं आणि छातीत धडकी भरवणाऱ्या जावळीच्या निबीड आरण्याचं दर्शन घडवते. डिझेलचा धूर उडवत जाण्याऐवजी होडी वलहवत का नाही आपण प्रवास करत अशीही चक्रम कल्पना डोक्यात आल्याशिवाय राहात नाही. कारण तो परिसर आहेच तेवढा निसर्गसंपूर्ण. निसर्गसंपन्न नाही उरलीयेत ती आपली शहरी डोकी. नॅचरल एसी आहे त्या खोऱ्यात. सकाळच्या दहा वाजता देखील पहाटेच्या गार वाऱ्याचा शहारा अंगावर जाणवावा एवढा शीतल वारा आहे तिथे.

घड्याळी एक तास घेऊन जेव्हा आमची बोट काठाला लागली तेव्हा समोर वासोटा किल्ला परिसराची वनखात्याची कमान दिसली. प्रवेश करताना आय डी प्रूफची नोंद द्यावीच लागते. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही की, वर गडावर जाण्यापूर्वीच खाली आपल्या सामानाची कसून चौकशी केली जाते. जितक्या प्लॅस्टिक बाटल्या, चॉकलेट्स, बिस्किट्स यांचे रॅपर्स त्या सगळ्या सगळ्या अविघटनशील सामानाची एक भली मोट्ठी लिस्ट वनखात्याचे कर्मचारी बनवतात. आपल्याला तो आकडा सांगितला जातो. आमच्या सोळा जणांच्या ग्रुपकडे मिळून तब्बल एकोणसत्तर प्लॅस्टिक जिन्नस निघाले. ते सगळे घेऊन आपल्याला खुशाल चढाईसाठी वर सोडलं जातं. मात्र पाचशे रुपये डिपॉझिट त्यापूर्वी जमा करून घेतलं जातं. खाली येताना जर आपण एक बाटली किंवा एखादं चॉकलेट रॅपर जरी गडावर कचरा करून टाकून आलो असलो तर मात्र प्रत्येक जिन्नसामागे पाचशे रुपये दंड भरावाच लागतो. आहे की नाही कमाल! ही अशी प्लॅस्टिकमुक्तीची मोहीम खरंतर संपूर्ण देशातल्या सगळ्या किल्ल्यांवर सुरु करायला हवी असं मनापासून वाटलं.

जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत आम्ही चढाईला सुरुवात केली तेव्हा पावणे अकरा वाजले होते. सनस्क्रीनसुद्धा आता वाचवू शकेल की नाही अशी शंका येण्याइतपत ट्रेकिंगसाठीची ही चुकीची वेळ होती. मात्र जस जसं जंगलात प्रवेश करते झालो तसतसं डोक्यावरचं झाडांचं गर्द हिरवं छप्पर अधिकच दाट होत गेलं. एवढं एवढं घट्ट जाळीचं सावली भरून राहिलेलं जंगल की साधा घामसुद्धा फुटत नाही तिथे सहजासहजी. पहिला पायऱ्यांच्या वाटेचा साधा टप्पा पंधरा मिनिटात पार झाला असेल. तोवर सेल्फी गप्पा यांचा सुकाळ सुरु होता; मात्र जस जसे दगड गोट्यांनी भरलेले झऱ्यांचे मार्ग पायाखाली आले तसतसे सगळे मोबाईल आपोपाप पाठीवरच्या सॅकमध्ये गेले आणि सापडतील त्या काठ्यांनी हातात त्यांची जागा घेतली. वासोट्याच्या पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचं गाव होतं म्हणे; त्याचे भग्न अवशेष अजूनही दिसतात. या अवशेषांच्या जवळूनच वासोट्यावर जाण्यासाठी ट्रेकर्सची पायवाट आहे. या वाटेने काही अंतर गेल्यावर ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती दिसते. तिथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होतं. ओढ्याचं पाणी स्वच्छ थंडगार आहे मात्र पोटाची काळजी घेताना ते केवळ हात पाय धुण्यासाठी वापरलेलंच बरं.

चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदं आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वलं प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणं सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं असं आम्हाला बामणोलीत स्थानिक लोकदेखील सांगत होते. 

मित्रांनो, वासोट्याचा ट्रेक हा अजिबात कपल ट्रेक नाही. जोडीने, नुसत्या एका दोघांनी मनात आलं म्हणून पहिल्यांदा अति उत्साहात करायचादेखील हा ट्रेक नाही. या ट्रेकसाठी किमान सहा आठ लोकांचा ग्रुप हवा. कारण जंगलात अस्वलं दर्शन देतात. अनेक चढणं अशी आहेत की ज्यात रडू येईल एवढी निमूळती वळणं आहेत. पाठीवर पाण्याच्या दोन छोट्या बाटल्या, संत्री आणि एखादा भाजी पोळीचा डबा सोबत घेतला तरी या एक दीड किलोच्या वजनाने देखील चढावर पुरती दमछाक होऊन जाते. मी गेली पंधरा वर्ष सहज कुठले ना कुठले ट्रेक करतेय तरी नक्की सांगेन की हा ट्रेक गृहीत धरावा एवढा सोपा नव्हता. आमच्याच ग्रुपमधल्या आमच्या दोन वहिन्यांचे एकेक हात वासोट्यावरून उतरताना पडून फ्रॅक्चर झालेत. त्यामुळे ही अजिबात अतिशयोक्ती नाही. शरीराचा तोल साधता येत असेल आणि चढाईची, उतरण्याची पुरेपूर तयारी असेल, अंगात भरपूर स्टॅमिना असेल तर आणि तरच वासोट्याला जा. अजून एक, वासोटा हा एकवेळ लहान मुलांसाठी करण्यासाठी पहिलाच ट्रेक म्हणून उत्तम ठरतही असेल परंतु असे प्रौढ की ज्यांना रोज भरपूर चालण्याची सवय नाही आणि आयुष्यात पहिल्यांदाच ट्रेकिंगला जायची इच्छा आहे त्यांनी चुकूनही लगेच उठून वासोट्याच्या वाटेला जाऊ नये. अर्थात, एवढा डिस्क्लेमर देण्यामागे एकमेव कारण हे आहे की सगळ्यांनी जीव सांभाळून सुखरूप हा ट्रेक पूर्ण करावा, एवढीच इच्छा. बाकी पट्टीच्या ट्रेकर्सने चुकवू नये असाच आहे वासोटा. आमच्या ग्रुपमध्ये राज्ञी, अर्पित आणि अपूर्व हे सहा ते नऊ वयाचे तीन लहान ट्रेकर्स होते. त्यांनी एकदाही आम्हाला उचलून घ्या वगैरे म्हटलं नाही. कारण त्यांच्या मनात भीतीचा लवलेशदेखील नव्हता, अंगात तुडतुडा उत्साह ठासून भरलेला होता, भरीस भर जावळीचा बेभान वारा सोबतीला होता आणि थंडगार जंगल तो स्टॅमिना कायम टिकवून ठेवत होतं.

पायात व्यवस्थित स्पोर्ट्सशूज घालून, अंग व्यवस्थित झाकणारे साधे सैल टी शर्ट पॅन्ट असे कपडे घालून मगच या ट्रेकला जायला हवं. सतत धपाक धपाक पडून खरचटण्याचे चान्सेसच जास्त आहेत. ग्रुपने स्वतःसोबत पेन किलर गोळ्या, बँडेज, प्रथमोपचार साधनं, स्प्रे वगैरे देखील ठेवायला हवं. आमच्यातल्या चाळीशीच्या दोन्ही वहिनी जेव्हा हात फ्रॅक्चर झाल्याने व्याकूळ झाल्या होत्या तेव्हा तडक डॉक्टरकडे जावंसं वाटत होतं परंतु जावळीच्या जंगलात डॉक्टर भेटतच नाही. चाळीस किलोमीटर दूर साताऱ्याला जाण्याशिवाय पर्याय नसतो. उशीरा उपचार मिळाल्याने त्यातल्या एकीच्या हातात आता ऑपरेशन करून रॉड टाकावा लागणार आहे. हे असं इथून पुढे कुणाच्याही बाबतीत होऊ नये म्हणूनदेखील हा लेखन प्रपंच!

अर्धा किल्ला चढल्यावर इंग्लिश एस आकाराची दोन दुर्दम्य वळणं लागतात. चढताना ती घाम काढतात आणि उतरताना अक्षरशः तुम्हाला ती ढकलून देतात. हीच वाट पुढे नागेश्वराकडे जाते. नागेश्वर मंदिराची चढण अतिप्रचंड अवघड आहे असं ऐकलं. ती वाट म्हणे केवळ महाशिवरात्रीला उघडी करतात. एरवी ती ट्रेकर्सच्या सुरक्षिततेसाठी बंदच ठेवतात. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचं रान लागतं. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.

गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाला बर्ड्स आय व्ह्यूने पाहता येतं. हिरव्या गालिच्यात अंथरलेलं ते निळं माणिक वाटतं. पाण्यातून वाट काढत येणाऱ्या बोटीतून काही केल्या वासोट्याचा सुळकादेखील दूरवरून का बरं दिसत नव्हता त्याचं तिथे उत्तर मिळतं. दिमाखात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याखाली उभं राहून फोटू काढावासा वाटतो तेव्हा जाणवतं की या गडावर पोहोचणं इतकं इतकं दुर्लभ आहे की कैदेत टाकलेल्या शत्रूलादेखील  खाली पळून जाणं खरंच मरणप्राय वाटत असावं. वर डांबून ठेवलं तर कैदेत कोंडून तरी मरण येणार आणि खाली पळून जावं तर  जावळीचं भयाण जंगल जीवाचा लचका तोडून खाल्ल्याशिवाय सोडणारच नाही. त्यातूनही बचावलो तरी खालच्या अथांग शिवसागरात बुडून मरण्याची भीती होतीच. शिवरायांच्या महान नेतृत्वाला मनोमन मुजरा केल्याशिवाय फोटू बिटू काढणं खरंच जीवावर येतं. धन्य ते राजे! धन्य तो सह्याद्री!

शिवराय मला कायम अवतारी पुरुष वाटतात त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी पंचमहाभूतांना आवाहन करून स्वराज्याकामी अनुकूल करवून घेतलं होतं. समुद्राच्या मधोमध बांधलेल्या खाऱ्या पाण्याच्या सिंधुदुर्गावर त्यांना जशा गोड्या पाण्याच्या दोन दोन बावी सापडल्या त्याचप्रमाणे इथेही दुर्गम्य अशा या व्याघ्रगडावर म्हणजेच वासोट्यावर अगदी माथ्यावर गोड्या पाण्याच्या दोन टाक्या त्यांच्या हाती लागल्या. पूर्वीच्या काळी पिण्यायोग्य पाणी गडावरच होतं. सध्या मेंटेनन्स अभावी मला तरी ते पिण्यायोग्य जाणवलं नाही.

शिवरायांच्याही आधी म्हणजे अगदी पूर्वी शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने जेव्हा वासोट्यावर थोडं फार बांधकाम केलं असेल तेव्हा एवढ्या तोडी, कातळातून घडवलेले कभिन्न चिरे नेमके वर कसे उचलून नेले असतील की तिथेच कातळ शोधून घडवले असतील हा प्रश्न जाम त्रास देतो. त्याही आधी म्हणजे पृथ्वीवर म्हणे जेव्हा हिमयुग होतं त्यावेळी ज्वालामुखीच्या वर उसळलेल्या लाटा वासोट्याच्या खांद्यावर येऊन थंडावल्या की काय असं वाटावं इतक्या कोरीव डोंगररांगांनी हा व्याघ्रगड वेढला आहे. वरून दिसणारा नजारा ट्रेकर्सला खिळवून ठेवतो हे नक्की.

जेवणावर तुटून पडल्यानंतर आम्ही वाटेवरच्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मोठ्या वाड्याचे अवशेष बघताना हेही ऐकायला मिळालं की म्हणे इंग्रजांनी तोफा डागून वासोट्याची जमेल तेवढी पडझड करण्यात अजिबात कसर सोडली नव्हती. गड उतरायला सुरुवात करण्यापूर्वी उत्तरेकडच्या एको पॉईंटवर पाय खरडत गेलो. पाय एव्हाना एवढे बोलू लागले होते की फूटभरसुद्धा जास्त चालायची इच्छा उरली नव्हती.

एको पॉईंट मात्र आमचीच वाट पहात होता. कुठल्याही तटबंदीशिवाय भणाण वाऱ्यावर दिमाखात उभी असलेली ही माची तुमचा घसा फोडते. मोठ्या ग्रुपने जर तुम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केलात तर केवळ तीन सेकंदांच्या फरकाने तुम्हाला प्रचंड कंपनांमधून अति सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतो, तोही जसाच्या तसा. जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव म्हणत आम्ही सोळाही जण जीव तोडून घसा फोडून एवढे एवढे मजा लुटत होतो की तिथेच उभं राहून आयुष्यभर महाराजांचं नाव घेत राहावं असं वाटून गेलं. एको पॉईंटची मजा चाखण्यासाठी छातीत दम साठवून वासोटा चढून पाहावाच एकदा.

गड उतरताना आम्ही पुरेपूर काळजी घेत होतो. मोबाईलला कास पठारापासून नसलेली रेंज अचानक वरच्या सुळक्यावर मिळाल्याने लक्ष विचलित झालं असावं. खरंतर तेही खास कारण नव्हतं, उतारच एवढा तीव्र होता की दोघीजणी पायाखालच्या गोल छोट्या दगडांवरून गडगडत पडल्या. कितीही काळजी घेतली तरी असे उतार नाकी नऊ सोडतात हेच खरं. एकमेकांच्या आधाराने आम्ही सगळ्यात वरच्या टोकाची महाकठीण इंग्लिश एस ची वळणं पार करत खाली आलो. येताना वाट चुकतेय की काय असं वाटावं एवढी न संपणारी लांबच लांब मार्गिका आहे ती. खाली पायऱ्यांना येऊन लागलो तरी गड संपत नाही. हातातलं स्मार्टवॉच सतत अभिनंदनाचे व्हयब्रेटर वाजवू लागलं होतं. जाऊन येऊन खरंतर दमून चढून उतरून एकूण साडे आठ किलोमीटरचा ट्रेक आहे वासोट्याचा.

संध्याकाळी साडेचारलाच किर्रर्र अंधार पडतो या गडावर, कारण सावल्यांनी सूर्य दिसतच नाही कधी. जंगलच तेवढं घट्ट आहे. पाचला आम्ही परतीच्या बोटीत बसलो आणि बामणोलीत मावळत्या सूर्याला न्याहाळत ठार अंधारात येऊन सव्वा सहाला पोहोचलो. साध्या बोटीला हेडलाईट वगैरे काहीच नसतो त्यामुळे चार वाजताच वासोट्यावर वनखात्याचे कर्मचारी शिट्ट्या वाजवून ट्रेकर्सला खाली पाठवून देतात. बामणोलीत आल्याशिवाय चहा मॅगी काहीच मिळू शकत नाही. काठावरचा नारायण महाराजांचा भुयारी मठ चुकवू नये एवढा शांत गंभीर आणि पवित्र आहे.

सातच्या अंधारात आमच्या बस ड्रायव्हर दादांनी आम्हाला शिताफीने कास व्हिलेज रिसॉर्टमध्ये आणून सोडलं. शेकोटीच्या ऊबेत डोक्यावर पसरलेल्या लख्ख चांदण्यांच्या साक्षीने रात्र चढत गेली. शेजारी सांडलेल्या शिवसागर जलाशयाच्या थंड लाटांनी थंडी पहाटेपर्यंत घेरून बसली होती. दुर्गतम रत्न वासोटा सर करून आल्याचं वेगळंच समाधान उगवतीचा तेजस्वी सूर्य देऊ करत होता. गडावर ऐकलेल्या गोष्टीतली ताई तेलीण नेमकी कोण होती आणि पेशव्यांच्या बापू गोखले या पंतप्रतिनिधीशी आठ महिने झुंजून गड राखू इच्छिणारी ही वाघीण नेमकी किती शूर होती ही वाऱ्यावर विरून गेलेली अनुत्तरित गोष्ट मात्र डोक्यात रुंजी घालत राहिली.

_________________

#wasota #wasotatrek #bhatkanti #travelblog #kaaspathar #sataratrek



























गुरुवार, ११ मार्च, २०२१

World famous song 'Sojugada' is now winning Marathi hearts!

                             

      Being a lyricist, I believe, there is always a special story behind every song, a special instinct that forces you to put down the words with the melody. Behind the Marathi version of Sojugada, I always felt that immense energy while creating a song, and I call it, an ultimate Shiva instinct!

     I still remember, last year I was just surfing thru insta on Mahashivratri night and came across Sadhguru’s Isha event just by chance. Various artists around the globe were performing their art in devotion to Lord Shiva, and then at late night around 12: 30, came a girl in a yellow and blue dress on the stage, she preferred to sit down with musicians, smiled wholeheartedly and started singing a devotional song in her uniquely raw voice. That was a prayer, which I could not understand with its words, but I could absolutely feel its purity. Total bliss to my ears! 

     Two weeks later, one of my recordist friends Nilesh shared with me a post; as someone was looking for lyricists from various languages for creating a remake of one Kannada Song. Kannada into Marathi! My eyes blew up! Why did someone want to do so? Is there really someone who is equally enthusiast for preserving our rich Indian regional languages thru such artistic experiments? And what was the song? I simply googled the name of the song and I landed upon the world-famous YouTube video of that Mahashivratri night, which I witnessed already. The song was 'Sojugada Sooju Mallige', sung by the Voice of Karnataka folk music, Ananya Bhat!

     Ananya, a gifted vocalist of the south Indian music industry, one of the finest stage performers of Indian folk music, a front girl of her own band, named ABC, a trained theatre artist, and an approachable soul, now a friend! She is the second person I see after Hritik Roshan who received overnight popularity and who carried that fame for contributing to the well being of society! I am fortunate that I could get a chance to work with her throughout a year and every time I discovered her passion for the folk music of India, not just Karnataka but India, I repeat. She is always in search of music that is deeply rooted in the generations of our nation! She finds out the rarest folk instruments that one cannot even imagine. Giving you an example, a ring instrument for rhythm, called 'Ghaghra' in Kannada, which she has worn in her thumb in the Sojugada Shivratri Video is actually an ornament, generally used to decorate bull horns for noticing their presence! It makes a sound, belongs to our folk, she uses it in her performances! Different know?

     'Sojugada Sooju Mallige' is a song that originates from Kannada Janapada Geethe! It is the best example of our traditional oral literature. Obviously, the great original lyricist remained unknown. For me, it was a perfect task to stick with the melody of the song and also to convey its word to word meaning into my mother tongue Marathi without changing its approach. If you listen to it carefully, you will notice, the words Sojugada Sooju Mallige themselves express the stringed beauty of this song. Marathi words should have been quilled over tune in a repeating manner, that too with keeping original Kannada meter in mind! My friends Girish SH and Sneha Walande helped me in understanding the meaning of Sojugada, meanwhile, subtitles started appearing on Ananya's Shivratri performance, the video went viral- became an international sensation of 2020, was hitting lakhs of views overnight. It took around four days to flow the Marathi version into my veins and finally, words took shape one night when I could not fall asleep without putting them down on my laptop.

     I also must share my experience of recording this song. Doubtlessly, a musical treat again! Literally, goosebumps in the stomach when Ananya closed her eyes and touched the cloud with her 'Mahadeva'. Only a studio glass in between! The great Shiva instinct I realized everwhere! Everyone knows about her power-packed singing style, needless to spend words here. Must say, her disciplined approach towards work and dedication towards perfection are the things which smoothened the work! We recorded Sojugada Marathi just two weeks back, and as we were heading towards Shivratri, Ananya was telling me to plan its release for audio platforms only. Coincidently there were our two film director friends present in the studio, Rohan Shingade from Marathi and Guru Savan from the Kannada industry, both were convinced about its picturization. Finally, Ananya finished the song for making it available also for the video platform! Midas touch of our sound recordist Ruturaj Kulkarni (TSM Studios, Pune) played a vital role indeed!

     For me, language is not just a way of communication or not the thing which builds up communities under territorial roof. Language is the road map of a culture, it tells you where its people come from and how far you can walk with them to discover the new dimensions of life! Sojugada has proved, devotion is the purest bliss, even languages are not required to deliver it! The song has touched crores of hearts and changed millions of lives. People say Sojugada has crossed the borders, I would prefer to say Sojugada has united the whole world under one shiva roof! It doesn't matter whether you listen to it in the original Kannada or now in the Marathi, it will touch you uniquely if you are ready to see its magic! 

     Fights are still going on Belgaum borders, we are fortunate to become a part of the masterpiece Sojugada, a peaceful prayer, which touched people on the ground of humanity!

     I became speechless when Ananya said, 'Praju, this is the first time, I recorded Sojugada properly in the studio!'.... 'That too in my Marathi!'... I whispered super proudly in my own ears! Being a KGF Chapter 1-2 playback singer Ananya Bhat perfectly knows the magic of multilingual singing and I am the fortunate lyricist who witnessed her honest efforts of singing, for her very first song in the Marathi language! It makes me always proud when artists like Ananya shows respects towards my mother tongue! She has a folk heart and a global ear I must say!

     I believe in people. We all are cosmic children! We have to tune up across borders to enjoy this virtual era! We need to work fullest for world peace! Miracle happens! Millions of hits can also be faked with money backing statistics and crores of hits can also be gained with purity and devotion! A song, that stole Sadhguru's heart is healing people, especially in this crucial pandemic! A girl, who stole Sadhguru's heart can easily steal anyone's heart in any language! I am happy, I met her, and we could gift each other this artistic piece!

Kindly listen to our Song, Shubhra Champa Pushpe Gumpheete (Sojugada Marathi version): https://www.youtube.com/watch?v=8xn9P91RrWU

Original Kannada Song: https://www.youtube.com/watch?v=P7mz7PtuQZs

Keep sharing.. keep loving! 

-       Prajakta Gavhane

 





मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

“अजून तर खूप काम करायचंय!”...... गडचिरोलीतल्या डॉ. अश्विनी महाजनशी बातचीत

३१ डिसेंबर २०२०. अर्थातच अविस्मरणीय वर्षाची संध्याकाळ. मी फोन लावत होते. रेंज मिळत नव्हती. अखेर “पूरा देश इस बिमारीसे लढ रहा है” वगैरे शास्त्र उरकून अमिताभजींच्या पल्याड बीप बीप वाजलं ... पण फोन लागूच शकला नाही.

रीवाजाने व्हॉटसअप विंडो > मग आधी मनातलं उमटलं > मग परत खोडलं गेलं! हिला मुलाखत वगैरे दे म्हटलं तर एका नम्र नकारात सगळ्या शक्यता संपुष्टात येतील > मग गुगली सुचली (संपादकीय खुर्चीची कृपा!) > sent > एक टिक > दुसऱ्या दिवशी दोन टिक!

मग नेटवर्क गवसलं पण वेळ अपुरा...

दुसरीकडे ‘स्पंदन’चा पुरा अंक जवळपास तयार झाला होता...

परत वेळ आणि दिवस वेगळा..! कारण ती प्रवासात..

अखेर एका फोनकॉलएवढी निवांती हाती लागली!

पलीकडे फोनवर होती प्रबोधरत्न डॉ. अश्विनी महाजन!.... ती म्हटली, ‘स्टोरी वगैरे नको करू गं. अजून कशातच काही नाही... अजून तर खूप काम करायचंय... तुला काही इंटरेस्टिंग वाटलं तरच छाप’!!

.....

अश्विनीताई, कुठे आहेस सध्या?

अगं, गडचिरोलीत! आणि खूप सॉरी... अचानक प्रवासाचं ठरलं.

सॉरी काय त्यात! नेटवर्कची मात्र खूपच मारामारी दिसतेय!

उलट चांगलंय नेटवर्क आता! आणि इथे शहरी भागात असतं नेटवर्क. पूर्वी एवढंही नव्हतं अगं. इथे आल्यावर इथल्या कलेक्टरच्या मागे लागून लागून फायबर कनेक्टचे बरेच उद्योग केले आणि किमान आमच्या पीएचसीसाठी तरी म्हणजे दवाखान्यांमध्ये तरी नेटवर्क मिळवलं. पण अजूनही जिल्ह्याच्या ५०% हून अधिक भागात नेटवर्क नाहीये.

जंगलात असते का गं रेंज?

नाही. नाही. तिथे अजून शांती अबाधीत आहे. आदिवासी पाड्यांमध्ये गेले की तिकडे नसते रेंज. पण गडचिरोली म्हणजे काय संपूर्ण अरण्यप्रदेश नाही. शहरी भाग झालाय इथेही विकसित. नक्षलवादी जिल्ह्यांत हा प्रदेश मोडतो, त्यामुळे इथल्या विकासाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत, एवढं मात्र खरं!

सध्या नेमकं काय काम करतेयस?

सध्या मी UNICEF या जागतिक बालक-आरोग्य संघटनेची District Health and Nutrition Consultant म्हणून काम करते.

वाह! मस्तच! आधी तू ओरिसातल्या ‘स्वास्थ्य स्वराज’ सोबत काम करायचीस ना?

हो. तो एक विलक्षण सुंदर अनुभव होता. खरंतर त्या आधी छत्तीसगढच्या जन स्वास्थ्य सहयोग संस्थेत डॉक्टर म्हणून काम करायचे. गनियारी नावाचा बिलासपूरमधला दुर्गम इलाखा आहे तो! तिथलं कामही मला खूप आवडायचं. शहीद हॉस्पिटलमध्येही काम करण्याची संधी मिळाली त्या दरम्यान! शहीद हे नाव तिथल्या खाण कामगारांनी त्यांच्या बांधवांच्या स्मरणार्थ ठेवलंय. खाण कामगार चळवळीत बरेच जण मारले गेलेत. गरीब आहेत तिथले लोक पण त्यांनी एकत्र येऊन रुग्णालय बांधलंय. मला त्यांच्यासाठी  थोडंफार काम करता आलं. डॉ. अभय बंगांच्या ‘सर्च’चं कामही मी जवळून पाहिलंय. पब्लिक हेल्थ हा कायमच माझ्या जिव्हाळ्याचा विषय ठरलाय. ऊर्जा देतो तो मला! इथे आता गडचिरोलीत UNICEF मार्फत मी आरोग्य आणि पोषणविषयक सामाजिक जागृती करण्याचं काम करते.

तेही ऐन कोरोनात?

हो ना! श्रीमंतांनी जगभर विमानाने पसरवलेला हा आजार आमच्या जंगलवाटांपर्यंत येऊन थडकेल असं गेल्या वर्षी यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तो आलाच! आतल्या आदिवासी पाड्यांबाबत आम्ही थोडे निश्चिंत होतो पण गडचिरोलीतला नागर वस्तीचा जो शहरी भाग आहे ना तिथे खरंच धाकधूक होती. इथे साधा पोलिओचा डोस पोहोचवेपर्यंत किंवा रोजच्या जगण्यातल्या साध्या साध्या स्वच्छतेच्या सवयी समजावून सांगेपर्यंत कधीकधी नाकी नऊ येतं. अगं, डॉक्टरची पायरीच सहसा चढत नाहीत इथले आदिवासी लोक.

काय केलंस नेमकं अशा वेळी?

वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता. पटापट तयारीला लागलो. पहिली गोष्ट ही केली की बाहेरून आलेला प्रत्येक अन् प्रत्येक माणूस आधी चौदा दिवस कॉरन्टाइन होतोय याकडे जातीने लक्ष दिलं. ते का करायचं हे इथल्या जवळपास सगळ्या लोकांना समजावून सांगितलं. इथे डॉक्टरपेक्षाही नर्सेस, आया, अगदी आंगणवाडी सेविका, आशाताई या लोकांना जवळच्या वाटतात. त्या सगळ्या महिलाही लोकांसाठी खरंच खूप मनापासून काम करतात. गव्हर्नमेंट बॉडीची मदत घेतली. किती ऑक्सिजन बेड्स लागतील, कुठे कसे ते उभे करता येतील या कामात मी स्वतःला झोकून दिलं. सुरुवातीला खरंच खूप ताण आला पण लोकांचे जीव अखेरीस संपूर्ण टीमवर्कमुळेच वाचले.

लॉकडाऊनचा परिणाम किती होता?

ते तर काही विचारू नकोस. जगासाठी लॉकडाऊन वेगळा होता, पण इथला लॉकडाऊन सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहीत. अगं इथलं संपूर्ण जनजीवनच ठप्प झालं अगदी आजपर्यंत आम्ही त्याचे परिणाम भोगतोय. एसटी गाड्यांशिवाय इथे प्रवास होत नाहीत. एवढी वर्ष हातापाया पडून मुलींना शाळेत पाठवा वगैरेसाठी केलेली मेहनत धोक्यात आलीये. इथल्या मुलींचं शाळेत येणं हे फक्त पुस्तकी शिक्षणासाठी नसतं गं. आरोग्याच्या खूप गोष्टी त्याद्वारे आम्ही शिकवतो त्यांना. परवा एक चौदा वर्षांची मुलगी गरोदर असल्याची केस हाताळावी लागलीये. लॉकडाऊन झाला, टाळ्या थाळ्या सगळंच झालं पण इथलं वास्तव कुठल्याही टीव्ही चॅनेलला कधीच कळू शकणार नाही एवढं भयानक होतं. घरी परतणाऱ्या मजूरांचे कमालीचे हाल झाले. इथून हैदराबाद म्हण किंवा आणखीही इतर राज्यांपर्यंत त्यांनी सायकलवर  प्रवास केला. कसलं आधारकार्ड आणि कसलं रेल्वे आरक्षण! पुरं जगणंच चाकावर हाकायचं होतं. किमान त्या प्रवासात त्यांची जेवणाची सोय व्हावी यासाठी आम्ही खटपट केली. माझ्या नवऱ्याची या कामी खूप मदत होते. तोही माझ्यासारखाच डॉक्टर आहे, इथला गडचिरोलीचा आहे. आम्ही दोघेही पब्लिक हेल्थ मेडिकल सेक्टरमध्ये काम करतो.

पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये यायचं कधी ठरवलंस?

छत्तीसगढ- बिलासपूरमध्ये काम करताना! गनियारी हे खूप छोटसं खेडेगाव आहे तिथे ग्रामीण रुग्णालयात  डॉक्टर म्हणून काम करताना मी सर्पदंश झालेले पेशंट्स हाताळलेत. कुपोषणाच्या समस्या तर रोजच असायच्या. तिथे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना आम्ही खूप युक्त्या लढवून बरं करायचो. अत्यंत कमी खर्चात आय सी यु सारखे वॉर्डस उभे करायचो. गावातल्या लोकांना आरोग्याची सेवा देताना माझ्या लक्षात आलं की इथे आरोग्यविषयक भान निर्माण करण्याची खरी गरज आहे. एरवी सर्जन किंवा अमुक तमुक स्पेशालीस्ट डॉक्टर्सविषयी, त्यांच्या शस्त्रक्रियांविषयी पेपरमध्ये छापून येतं. पण सामाजिक आरोग्य क्षेत्रात जनजागृती करणारे डॉक्टर्स मला पडद्यामागचे खरे कलाकार वाटतात. खास करून आदिवासी आणि ग्रामीण भागात तर त्यांचं काम कमालीचं महत्वाचं आहे.

काही दिवसांपूर्वी आनंदवन ढवळून टाकणारी घटना घडली. त्याच भागात तू काम करतेस. तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?

केवळ पहिली प्रतिक्रिया नाही तर कायम मला हे ठामपणे म्हणावसं वाटतं की, सामाजिक सेवांमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीकडे तिचं वलय बाजूला ठेवून, आपण केवळ माणूस म्हणून का नाही पाहू शकत? शीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मनापासून वाईट वाटलं. पण एकूणच ज्या पद्धतीने मिडीयाने तो विषय हाताळला, पत्रकं फिरवली गेली ते पाहून खरंतर भीती वाटली, काळजात धस्स झालं! मी आज सामाजिक आरोग्य आणि पोषणाच्या क्षेत्रात काम करते. माझे अनेक मित्र मैत्रिणी स्वतःला झोकून देऊन लोकांसाठी जीवाचं रान करतायत. वलय बाजूला ठेवून आपण सगळ्यांकडे केवळ माणूस म्हणून नाही का बघू शकत?

तू बोलतेयस त्यात तथ्य आहे पण काही उपाय?

प्रत्येकाने फक्त आपलं काम प्रामाणिकपणे केलं तरी बरेच प्रश्न सुटतील असं वाटतं. तुम्ही जेव्हा तुमचं काम नीट करत नाही, किमान प्रोफेशनल एथिक्सदेखील पाळत नाही तेव्हा उगीच तुम्हाला इतरांचं काम वलयांकित वाटू लागतं! वलय आलं की अपेक्षांचं ओझं ओघाने येतंच!

हा झाला तुझा विचार पण रोज काम करताना तुझ्या आजुबाजूला तुला अशी उदाहरणं दिसतात?

हो हो. इथे गडचिरोलीत तर बरीच दिसतात. या भागाने मला खूप ऊर्जा दिली असं म्हणेन. अगदी आशा- आंगणवाडी सेविका असोत किंवा पब्लिक हेल्थ वर्कर्स असोत, कायमच ते त्यांचं त्यांचं काम खूप मनापासून करताना मला जाणवतात. एक छोटा प्रसंग सांगते, एक बाई परवा बाळंत झाली आणि तिच्या तान्हुल्या बाळाला डायरिया झाला. डॉक्टरकडे सहसा जातच नाहीत इथले लोक. ती बाई खूप घाबरली होती. डॉक्टरने खूप समजावलं तिला की दवाखान्यात बाळाला ऍडमिट कर म्हणून, पण तिने काही ऐकलं नाही. शेवटी तो डॉक्टर त्या बाईला आणि बाळाला त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यासाठी घेऊन गेला आणि ते बाळ वाचवलं. दिसायला छोटी कृती दिसेल ही त्याची, पण खूप काही शिकवून जाते ही गोष्ट मला! ओरिसातदेखील मी आम्हाला मदत करणाऱ्या अशाच ऊर्जादायी बायकांना पाहायचे. घरची सगळी कामं आटोपून, शेतातली कामं उरकून, मग एक आख्खा डोंगर चढून त्या यायच्या मला मदत करायला! 

तुझ्या या प्रवासात शाळेचं योगदान किती आहे असं तुला वाटतं?

खूप मोठं योगदान आहे. मी गुरुकुलच्या पहिल्या तुकडीची भाग्यवान विद्यार्थिनी. भाग्यवान यासाठी म्हणेन की, मा. भाऊंचा खूप सहवास त्यावेळी लाभला. ते जिथे कुठे प्रवासाला जायचे तिथेही सोबत घेऊन जायचे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना. सगळ्याच शिक्षकांनी पोटच्या पोरांसारखं प्रेम दिलंय आपल्याला, तुलाही माहितच आहे की! पंचकोशाधारित शिक्षण हा त्यावेळी न समजणारा शब्द होता, पण आज जाणवतंय की किती बारकाईने विचार केला होता त्यांनी शिक्षणाचा! या मुलांना खेळता आलं पाहिजे, यांना कलाविषयांची ओळख करून दिली पाहिजे, यांना समोरच्याला प्रश्न विचारता आले पाहिजेत, यांचं पाठांतर उत्तम हवं, यांना लोकांची दुःख समजून घेता आली पाहिजेत. मातृभूमी परिचय शिबीर हा गुरुकुलात वर्षभराच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवून भाऊंनी काळाच्या पुढचं शिक्षण निर्माण केलं. मला कायम वाटतं की, ही संवेदना- सहवेदना जर शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात माझ्या शाळेने जाणीवपूर्वक रुजवली नसती तर कदाचित हे सेवाक्षेत्र मला कधीच समजलं नसतं.

मला आठवतंय तू शाळेत असताना कीर्तनदेखील करायचीस!

मजा असते! शाळेत जाऊन फक्त अभ्यास थोडीच असतो करायचा!

सध्या नवीन काय चालू आहे?

लेखन करतेय. दोन तीन वर्षांपूर्वीपासून एक रिसर्च पेपर लिहायचा राहिलाय आणि एका संस्थेसाठी रिव्ह्यू लिहितेय.

‘स्पंदन’साठी सुद्धा वेळोवेळी लिहित जा!

हो हो नक्की! माजी विद्यार्थी संघटनासाठी माझ्या परिने होईल तेवढी मदत मी नक्की करत जाईन.

.....

ती म्हटली होती, तुला काही इंटरेस्टिंग वाटलं तरच छाप’!!

मी माझं काम केलंय. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा!

प्राजक्ता गव्हाणे 

jpnv.spandan@gmail.com


वरील मुलाखत ही ज्ञान प्रबोधिनीच्या स्पंदन या मासिकासाठी घेतली आहे. स्पंदन हे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे संवादपत्र होय. संपूर्ण -अंक सर्वांसाठी खालील लिंकवर उपलब्ध आहे. शाळा नावाचा खास कोपरा ज्या ज्या रसिकमनात राखीव आहे त्या त्या प्रत्येकासाठी खुला आहे हा अंक!

Download ‘Spandan’ herehttp://bit.ly/39tRbIG







फॉलोअर

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत...